माणूस स्वतःला जात, धर्म, भाषा, देश, पक्ष, यावर आधारित ज्या गटाचा समजतो त्याचा तो अभिमान बाळगतो. त्यांत त्याचा उद्देश आपल्या गटाला त्यांतील काही असामान्य व्यक्तींमुळे जे मोठेपण मिळालेले असते त्या मोठेपणावर हक्क सांगण्याचा असतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर मोठे होण्यासाठी स्वतः काही न करता फुकटांत मोठेपणा मिळविण्याचा हा प्रयत्न असतो. मात्र आपल्या गैरवर्तणुकीमुळे आपल्या गटाला कमीपणा येण्याची शक्यता आहे ही गोष्ट त्याच्या लक्षांत येत नाही.
याउलट माणूस आपल्या गटावर प्रेम करू लागेल तर आपल्यामुळे आपल्या गटाला मोठेपणा कसा प्राप्त होईल याचा तो विचार करील व त्याप्रमाणे कृती करील. आपल्या वर्तणुकीमुळे आपल्या गटाला कमीपणा येणार नाही याचीही तो काळजी घेईल. त्यांत त्याचा स्वतःचा विकास होईल, त्याला गटातच नव्हे तर गटाबाहेरही मान्यता मिळेल व गटाच्या मोठेपणांत भरही पडेल ज्यांतून गटांतील होतकरूंना प्रेरणा मिळेल.
तेव्हा स्वतःची जात, धर्म, भाषा, देश, पक्ष, विसरण्याची गरज नाही. फक्त आपल्या गटाचा अभिमान न बाळगता त्याच्यावर प्रेम करा.
पहा पटतंय का!