Sunday, June 21, 2009

तो चिमुकला चेहरा

सिग्नलपाशी रिक्शा थांबली. उजवीकडून चिमुकला हात पुढे झाला. चेहरा बघायच्या आधीच सणसणीत शिवी हासडली. चटका बसल्यागत हात मागे. नजरेचा जाळ फेकण्यासाठी मान वळवली. समोर भेदरलेला चेहरा. चार-पाच वर्षांच्या मुलीचा.

पाचवी-सातवीत असतानाचा किस्सा. दोन रुपयांच्या दोन करकरीत नोटा कपाटातून 'उचलल्या' होत्या. चॉकलेटसाठी अशी उचलेगिरी बहुतेक वेळा ठरलेली. आईची नजर चुकवून घराबाहेर पडलो आणि 'ती' दिसली... चाळीच्या गेटवर कपड्यांच्या लक्तरात गुंडाळून बसलेली, कडेवर शेंबडं पोर. नजरेत व्याकूळ भाव. हात पुढे न करताही काहीतरी मागणारे. ती नजर चुकवून पुढे आलो. अशांना बाबा कधीतरी पैसे काढून द्यायचे ते आठवलं.

वाण्याकडे आलो. चार रुपयांचं 'डेअरी मिल्क' घेतलं आणि निघालो. थोडं पुढे जाताच पाय थांबले. गेटवर 'ती' असली तर? तिच्यासमोर चॉकलेट खात जाणं बरं दिसणार नाही. खिशातलं चॉकलेट बाहेर काढलं. खावंसं मात्र वाटेना. 'ती'चा चेहरा दिसत होता... गलबलून आलं. वाण्याकडे परतलो. डेअरी मिल्क परत करून साधी चॉकलेटं आणि दुसरी नोट परत घेतली. गेटवर ती होतीच. निमूट खिशातली नोट तिला दिली. व्याकूळ नजर हसली. मलाही बरं वाटलं...

' भिकारी' या व्यक्तीशी माझी पहिली 'वन टू वन' ओळख ही अशी... चोरलेले का असेनात, त्या भिकारणीला आपण पैसे दिले याच्या कौतुकाने कितीतरी दिवस हुळहुळत होतो... शाळेत जाता-येताना, आईबाबांबरोबर बाहेर जाताना, रस्त्यावर दिसणाऱ्या 'त्यांच्या'कडे बघणं मी टाळत नसे. फूटपाथवर, रस्त्यांवर झोपलेले हे भिकारी पावसाळ्यात काय करत असतील? भीक मिळाली नाही, तर काय खात असतील, अशा प्रश्नांचं काहूर माजे. बऱ्याच वेळा बाबांना सांगून मी त्यांना भीक द्यायला लावी. कधी माझ्या खिशातूनही चार-आठ आणे 'त्यां'च्या वाडग्यात पडत.

शाळा संपून कॉलेजलाइफ सुरू झालं, तरी भिकाऱ्यांबाबतचा कळवळा होता. चार आण्यांची जागा रुपया-दोन रुपयांनी घेतली. भीक देताना मात्र 'वगीर्करण' सुरू झालं. पहिला प्रेफरन्स म्हाताऱ्यांना, नंतर लुळ्यापांगळ्यांना आणि शेवटी 'देवाघरची फुले' असणाऱ्या मुलांना. धडधाकट भिकारी लिस्टमधून कधीच कट झाले होते!

नोकरी लागल्यानंतरही बदल झाला नाही. उलट भीक देण्यासाठी आता हक्काचे पैसे होते. स्टेशनात ज्यूस पिताना, वडापाव खाताना सामोर हात पसरून उभे राहणाऱ्या पोरांना, चायनीज गाड्यांभोवती उरलंसुरलं गोळा करत फिरणाऱ्यांना सहसा निराश करत नसे.
काही महिन्यांपूर्वी गोरेगावला शिफ्ट झालो. भिकाऱ्यांचं नवंच विश्व पाहत होतो. घर ते रेल्वे स्टेशनपर्यंत दोन सिग्नल शिवाय स्टेशनचा लास्ट स्टॉप. 'त्यां'ची व्हरायटीच पाहायला मिळायची. मुलं, 'बॅकअप'ला त्यांचे पालक... 'मालक' म्हणा हवं तर, म्हातारे हवे असतील तर तेही आणि हो, छक्क्यांची गँगही. भीक मागताना बिनदिक्कत स्पर्श करणारे. भसाड्या आवाजात 'बाबू... राजू' करत हक्क असल्याप्रमाणे पैसे मागणारे. नाही दिले तर अगम्य भाषेत शिव्याशाप देणारे. रोज तेच तेच 'धंद्यावर' बसलेले भिकारी... सगळ्याचा उबग येत गेला. भीक मागायला पुढे सरसावलेल्यांकडे तुच्छतेने बघणं, न बघणं जमू लागलं... हळूहळू 'कोरडा' होऊ लागलो होतो.

दिवाळीच्या आधीचा प्रसंग...

ऑफिसला जातानाची नेहमीची घाईगडबड. घरातून निघताना झालेला उशीर. पाचवीला पूजल्याप्रमाणे बस लेट. मग रिक्शा केली. डोक्यात राग होताच सिग्नलपाशी रिक्शा थांबली. उजवीकडून चिमुकला हात पुढे झाला. चेहरा बघायच्या आधीच सणसणीत शिवी हासडली. चटका बसल्यागत हात मागे. नजरेचा जाळ फेकण्यासाठी मान वळवली. समोर भेदरलेला चेहरा. चार-पाच वर्षांच्या मुलीचा. 'साहेबा'ला नाराज केल्याची बोच. 'धंदेवाईक'पणा अजिबात नाही. माझी नजर खाली गेली पण खिशात हात गेला नाही. सिग्नल सुटला आणि त्या मुलीचा संबंधही...

दुसऱ्या दिवशी सुट्टी होती रविवारची. पण झोपेत 'ती'चा चेहरा आठवला. तो दिवस अस्वस्थेत गेला. जेवताना, टीवीवरचे कार्यक्रम बघताना, कॉलनीत खेळणाऱ्या मुलांशी बोलताना ती बोच कायम होती. 'कोरडं' मन ओलावू लागलं होतं.

दुसऱ्या दिवशी मुद्दाम रिक्शा केली. सिग्नलपाशी ती नव्हती. तिसऱ्या दिवशीही तेच. चौथ्या दिवशीही नव्हती. रिक्शा सोडली. सिग्नलजवळच्या पेपरवाल्याकडे सहज चौकशी केली. त्यालाही ती मुलगी माहीत असण्याचं कारण नव्हतं. 'परवा तो राडा झाला ना साहेब, त्यानंतर इकडचे बरेच भिकारी कमी झाले. बहुतेक गेले असतील यूपी-बिहारला परत,'... पेपरवाला सहज म्हणाला.

शरमेची जागा अपराधीपणाने घेतली.... 'तो' चेहरा आणखी छळणार होता... निदान काही दिवस...

मन पुन्हा 'कोरडं' होईपर्यंत.

मुंबई शहरं आणि माणसं

सकाळचे आठ. ठिकाण दादर रेल्वेस्टेशन. खटडक् खटडक् खटडक् आवाजात लोकलचा प्रवेश. शेकडोंची गर्दी. उतरणाऱ्यांची, चढणाऱ्यांची घाई. मग एकामेकांना खुन्नस. यात कसा बसा मी चढलो. जागा भेटली. लोकल सुरू. डब्यात कित्येक जण उभे. जागा कमी-माणसं जास्त. काही उभ्यानेच डुलक्या घेतायत, कुणी उरलेला अभ्यास करतोय, कुणी कादंबरी वाचतोय तर कुणी तंबाखू चोळतोय. गेल्या दोन महिन्यात कित्येकांना अशा उरलेल्या गोष्टी अगदी उरलेल्या आयुष्यासकट संपवतांना पाहातोय.

संध्याकाळ... दिवस बरा गेला. ऑफिसातून बाहेर पडून सीएसटी स्टेशनवर आलोय. लोकलमधे जाऊन बसलो. भरपूर जागा, माणसं कमी. पण, काही वेळातच चित्र बदललं. पुन्हा तेच. जागा कमी, माणसं जास्त. लोकल सुरू. उभ्या असलेल्या माणसांना बाजूला करत एक भिकारी समोर आलाय. पिकलेले केस. जाडजूड चेहरा. हसताना तोंडातले दोन-चार दात साथ सोडून गेल्याचे दिसताहेत. उभं राहता येईल एवढी जागा त्याने तयार केलीय. गळ्यात अडकवलेल्या ढोलवर सराईतपणे थाप मारून चेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव आणून तो गातोय. मधेच थांबून, 'दिल बोला तो देनेका, नहीं तो इष्टाइल में रहेनेका!' हे त्याचं वाक्य सगळ्यांना आकर्षून घेत आहे. काही क्षणातच त्याच्या कटोरीत नाण्यांचा आवाज यायला लागलाय. तो खुश. त्याने हसून सगळ्यांना धन्यवाद दिलाय. माझं स्टेशन आलं. उतरलो...

दुसरा दिवस. ठिकाण दादर स्टेशन. पुन्हा गर्दी. चढणारे-उतरणारे. कसा बसा चढलो. शर्टाचं बटन तुटलं. खांद्याजवळ थोडंसं घासलंही गेलं. बसायला जागा नाही. आज माझ्यासकट माणसं खूप-जागा कमी. पाच फुटाच्या दरवाज्यात जवळपास बारा माणसं लटकून उभी! घामाचा वास, गमीर् यात कसंसं व्हायला लागलंय. ऑॅफिसात पोहोचलोय. अचानक कळलं आज कशाची तरी सुट्टी. मग दिवसभर फिरायचं ठरवतोय.

संध्याकाळी दादर चौपाटीवर बांधलेल्या कठड्यावर गेलो. अंगावर लाटांचे तुषार उडत होते. समोर एक माणूस उभा होता. आजूबाजूला त्या व्यक्तीशिवाय कुणीच नव्हतं. निळ्या रंगाची कॅप, अंगात जीर्ण शर्ट, पॅण्ट मुडपून गुडघ्यापर्यंत आणलेली. नुकतीच ओहोटी झालेली होती. काही वेळाने ती व्यक्ती खाली उतरली आणि किनाऱ्यावर तरंगणाऱ्या कॅरिबॅग्ज गोळा करणं सुरू केलं. मग तिने त्या कॅरिबॅग फोडायला सुरुवात केली. त्यातून फुलं, अगरबत्त्या, इतर पूजेचं सामान आणि राख खाली पडायला लागली. त्या व्यक्तीची बोटं जलद गतीने त्या बॅग्जमधल्या राखेमधे घुसत होती. त्याला काहीतरी सापडत होतं. पटापट तो त्या वस्तू खिशात कोंबवत होता. सगळ्या कॅरिबॅग संपल्यानंतर तो रस्त्याच्या दिशेने चालू लागला. त्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. प्रेताला अग्नी दिल्यावर त्या प्रेताची राख समुदात सोडलेल्या नातेवाईकांना माहीत असेल का हे सारं? कसं हे भयानक आणि अंतर्मुख करणारं. कोण होती ती व्यक्ती? केव्हापासून करत असेल तो हे सारं? उपजीविकेचा धंदा असेल का तो? स्वत:च्या जगण्यासाठी कुणाच्या तरी मृत्यूची वाट पाहणं, किती भयंकर आहे. गुजरातमधील कांडला बंदर चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे उध्वस्त झालं होतं. सरकारने मदत जाहीर केली. मृत मजुरांच्या नातेवाईकांना एक लाख रुपये देण्याचं ठरलं. गावाकडचे नातेवाईक कांडलाकडे रवाना झाले. आपल्या मृत व्यक्तीला घेऊन जायला आलेल्या काही नातेवाईकांना मात्र प्रेतं भेटलीच नाहीत. मग प्रेतांचा शोध सुरू, मग, माहिती मिळाली, की रात्रीतून आम्हीच या प्रेताचे नातेवाईक, असं सांगून प्रेतं विकण्याचा धंदा करण्यात आला होता. किती हे दुदैर्व त्या मृत मजुरांचं? जिवंत असतांना तोकड्या रुपयांवर काम करणाऱ्या त्या मजुरांची मेल्यानंतर किती किंमत वाढली होती.

वाढत जाणारी शहरं आणि माणसं. कुणालाच कुणाचं सोयरसुतक नाही. आधुनिकता लादणारं हे युग. मुंबईसारखं शहर वाढणारं... अन् वाढवणारं. या शहरात माणसाची कमी नाहीच फक्त संवेदनशील मनांची कमतरता आहे. स्टेशनसमोर भीक मागणारा तो वृद्ध, रस्त्याने जाणाऱ्या चकचकीत गाड्या, थांबून राहणारं ट्रॅफिक, त्याच ट्रॅफिकमधे अडकलेल्या अॅम्ब्युलन्स, शाळेत मुलांना सोडायला आणि घ्यायला जाणारे पालक, या मॉड शहरात अंगावर चाबूक मारून घेणारे पोतराज, पोटात अन्नाचा कण नसतानाही टाय लावून फिरणारे बँकांचे प्रतिनिधी, पुलाखाली बसून नशा करणारे गर्दुल्ले, शरीर विक्रयाचा व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांमागे गोंडा घालणारे उच्चभ्रू, असंख्य लोकाना घेऊन फिरणाऱ्या लोकल्स, पंचतारांकित हॉटेल्समधल्या श्रीमंतांच्या पार्ट्या तर कुठे शेकडो झोपडपट्ट्यांचं उध्वस्त जिणं. हे सारंच सुरू आहे. ठरल्याप्रमाणे किंवा ठरवल्याप्रमाणे...

शहर इतकंही छोटं नको, की प्रत्येकाला प्रत्येकाचं जिणं माहीत होईल आणि इतकंही मोठं नको, की ज्यातून वैयक्तिक ओळखच हरवून जाईल, हे तत्त्वचिंतक अॅरिस्टॉटल यांचं वाक्य मुंबईच्या गंभीर परिस्थितीला समजून घेण्यासाठी पुरेसं आहे, असं वाटतंय. या वेळी मात्र शेकडो प्रश्न उभे राहतात, दलितांना आरक्षण नको म्हणताना दुसरीकडे दलित स्त्रियांची अब्रू लुटण्याचं कमी झालंय? त्यांच्या वरचे अत्याचार कमी झालेत का? गांधीजींच्या देशात अल्पसंख्य ख्रिश्चनांना मारणारे, त्यांची घरंदारं उध्वस्त करणारे आले कुठून? इथे माणूस मरताना दिसत नाही! किती दिवस चालायचं हे सगळं? हातावर जगणाऱ्यांचं काय? चैत्यभूमीवर राख चिवडणारी ती व्यक्ती कशी जगत असेल? अण्णाभाऊ साठेंच्या कथेतला प्रेतं उकरणारा भिमा अन् या आधुनिक मुंबईतला राख चिवडणारी ती व्यक्ती, हे चक्र असंच सुरू राहणार का? श्रीमंत हा श्रीमंतच होत जाणार अन् गरीब गरीबच का? अजूनही नोकरीची वाट पाहणारे मिल कामगार? हे सगळं किती विचार करायला लावणारं आहे, पण हे राज्यकर्ते काय करताहेत? कितीही अवघड परिस्थिती आली, तरी त्यांनाच पुन्हा निवडून का दिलं जातं? पैशासाठी, बाटलीसाठी की जातीसाठी? काहीच कळत नाही. नेमकं कुणाला द्यावं हे जग चालवायला? 'उस आदमी को सौप दूँ दुनिया का कारोबार, जिस आदमींके दिल मे कोई आरजू ना हो,' या ताहीरच्या ओळींचं महत्त्व आता खरं वाटायला लागलंय. पण असा माणूस आणायचा कुठून?

तिसरा दिवस. लवकर उठलोय. आवरलंय. बाहेर आलोय. रस्त्यावरच्या बिहारीकडून चहा प्यायलो. स्टेशनमधे आलो. थोड्याच वेळात लोकलचा प्रवेश. रेल्वे सुरू. खटडक् खटडक् खटडक्...


Friday, June 12, 2009

उलाढाल (२००८)


















http://rapidshare.com/files/224646894/Uladhaal.2008.1CD.DVDRiP.x264.By.IndianHacker.mp4.001
http://rapidshare.com/files/224653835/Uladhaal.2008.1CD.DVDRiP.x264.By.IndianHacker.mp4.002
http://rapidshare.com/files/224659712/Uladhaal.2008.1CD.DVDRiP.x264.By.IndianHacker.mp4.003
http://rapidshare.com/files/224667376/Uladhaal.2008.1CD.DVDRiP.x264.By.IndianHacker.mp4.004
http://rapidshare.com/files/224818216/Uladhaal.2008.1CD.DVDRiP.x264.By.IndianHacker.mp4.005
http://rapidshare.com/files/224810635/Uladhaal.2008.1CD.DVDRiP.x264.By.IndianHacker.mp4.006
http://rapidshare.com/files/224692440/Uladhaal.2008.1CD.DVDRiP.x264.By.IndianHacker.mp4.007


Thursday, June 11, 2009

नव्या उमेदीने जग...

जग, तू नव्या उमेदीने राखेतून जगण्यासाठी उठल्याप्रमाणे, बघ प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीकोणातून. श्रावण असेल तर हिरवळीवर मनसोक्त लोळ अन्‌ शिशिरात पिकलं पान पडलं तर त्याला सोन्याप्रमाणे तोल. भेटला झरा सुखाचा तर समजून हा जिवनातील आनंद पण, झाला दगा आयुष्यात तर घे तो ही अनुभव आयुष्याचा. प्रत्येक क्षण वेचून हो अमृत म्हणून आयुष्य जगतांना फक्त नावालाच जिवंत राहू नकोस. वाईट गोष्टी, अनुभव लवकर विसरून जा. चांगल्या गोष्टी, अनुभव नेहमीच लक्षात ठेव कारण तेच भावी आयुष्यातील स्फुर्तीच उगमस्थान असेल, कोणी तुझं वाईट केलचं तर त्याचा राग द्वेष मनात कधीच ठेवू नकोस कारण द्वेषापेक्षा प्रेम करणे सोपं असतं तेव्हा त्यांच्यावरही प्रेमच कर कारण प्रेमानेच प्रेम वाढतं, कारण प्रेमासाठी आयुष्य कमी पडतं, तेव्हा कधीही प्रेमान भरलं मन तोडू नकोस कारण त्या मनामध्ये देव राहात असतो असं म्हणतात.
झालास यशस्वी जीवनात तर त्याचा आनंद घेतल्याशिवाय राहू नये पण आलं अपयश तर निराशही होऊ नकोस. मी सांगणार नाही तुला अपयश ही यशाची पहिली पायरी असते वगैरे. पण एवढं मात्र नक्की अपयश म्हणजे संपूर्ण जीवन नसते, लागतच नसेल कशात मन तर वाचून हो सुरुवातीला अपयशी झालेल्या यशस्वी व्यक्तींच्या कारकिर्दिची पुस्तक, मानते मी त्यातील सर्वच काही खरं नसते. पण त्यातील अपयशाकडून यशाकडे जाण्याचे मनोधैर्य तेवढं घ्यायचं असते, कर प्रेम सर्वांवर चांगल्यावर वाईटवर, वाईट लोकांवर जरा जास्तच कर कारण त्यांनाच खरं तर प्रेमाची आवश्यकता असते. आयुष्यात काहीच मिळालं नाही म्हणून कधी दुःख करू नकोस कारण ज्या गोष्टी मिळविण्यासाठी लोकांना आयुष्य घालवावे लागते त्या कदाचित आपल्याला जन्मताच न मागता मिळाल्या असतात तेव्हा त्यांचा उपभोग घे.
स्वतःला नशीबवान म्हणूनच जगात वावर कारण जो स्वतःला नशिबवान समजते तोच व्यक्ती आयुष्यात समोर जातो. नशीबात जे असतं ते घडते हे खरं पण सर्वच नशीबावर न सोडता त्याला मेहनतीची साथ दे. या जगात काहीच अशक्य नाही जे घडून गेले त्यावर कधी खंत व्यक्त करू नकोस त्यापेक्षा जे पुढे होणार आहे त्यावर लक्ष केंद्रीत कर.
स्वतःला मोठं दाखविण्याकरिता दुसर्‍या व्यक्तीस कमी माननेच आवश्यक नाही स्वतःमध्ये असे गुण बाळग की ज्यामुळे स्वतःच्या व इतरांच्या नजरेत मोठा होशील तुझ्याजवळ स्वाभिमान असू दे पण अभिमान मात्र कधी होऊ देऊ नको. कारण स्वाभीमान आणि अभिमान फार थोडेच अंतर आहे याच अंतराला तूला नेहमी कायम ठेवायचे आहे.

Wednesday, June 10, 2009

डिव्होर्स हवाय !!!

दारावरची बेल वाजते. एक तरुण पुरुष दार उघडतो... तरुण स्त्री अत्यंत वैतागून आत येते. दार लावून घेते. तो परत जे काम करत असतो त्यात गर्क होतो. ती बसून राहते , थोडा वेळ शांतता.

...

ती : मला डिव्होर्स हवाय....

तो : काय झालं ?

ती : आताच्या आता.... ताबडतोब मला डिव्होर्स दे.

तो : पण का ?

ती : मग तरी निदान - डिव्होर्सच्या धक्क्यातून सावरायला मी कुठेतरी लांब जाऊ शकेन गम भूलाने के लिये... कुठल्यातरी अभयारण्यात एकटी फिरेन. ना ही गर्दी असेल ना ट्रॅफिक जॅम. तुला माहितीये , चर्चगेट टू अंधेरी फास्ट ट्रेनने बरोबर ३५ मिनिटांत पोहोचले पण अंधेरी टू घर , दीड तास. इतका ट्रॅफिक जॅम होता की मी बसमधून उतरले नि चालू लागले. रस्ते पण इतके घाण झालेत आणि... आणि सतत कुठून तरी कोणी तरी थुंकत असतं. स्वत:ला बचावत कशीबशी पुढे आले , रिक्षा केली तर रिक्षावाल्यानेही फसवलं. सगळे फसवतात रे आपल्याला. आपण टीव्ही नाही घेतला , आपल्याकडे गिझर नाही तरी इलेक्ट्रिकचं बिल भरभसाट , मोबाइलवर पण कामापुरतं बोलूनही भयानक बिल. ते वाचलंस ना दुधात भेसळ , भाज्यांना केमिकल्स लावून हिरवं करणं - मला राग येतोय. त्यात आपली लिफ्ट बंद होती. मेण्टेनन्स कशासाठी भरायचा मग... मला डिव्होर्स दे किंवा दूर कुठेतरी घेऊन चल , कंटाळा आलाय - रोज तेच तेच...

तो : चल आताच्या आत निघू जी ट्रेन मिळेल त्यात बसू जिथे वाटेल तिथे उतरू कोणाहीकडे राहू दोन दिवस मुक्काम परत खांद्यावर शिदोरी घेऊन पुढे जाऊ रात्रभर तारे बघू , शेतात फिरू , उन्हात रापू , दिवसभर समुद्रकिनारी पहुडून राहू...चल.

ती : खरंच जाता आलं असतं तर किती बरं झालं असतं - असंच असावं ना आयुष्य.

तो : आर यू शुअर तिथे गेल्यावर गावात फिरताना कुठल्या शेतकऱ्याच्या आत्महत्येबद्दल आपल्या कानावर येणारच नाही ? समुद्रातही किती प्रदूषण वाढलंय दिसणारच नाही आपल्याला - म्हणजे आपण अगदी ठरवलं तर कदाचित नाही कळणार. आपल्याला सगळे सेन्सेज बंद करायची सवय तर लागलीच आहे म्हणा...

ती : बघू तू परत मला निराश करतोयस. मला माहितीये सगळं वास्तव भयाण आहे. पण एखादी वा-याची झुळूक कावळा , चिमणी , कबूतराव्यतिरिक्त एखादा पक्षी दिसणं ? जाऊ देत काहीच शक्य नाही - आणि रोजची पैसा मिळवून देणारी कामं सोडून जायची धमकही नाहीये रे - उद्या माझं प्रपोजल सँक्शन होईल का ? आज बॉस खुश झाला - बास्स एवढंच आयुष्य... म्हणून मला एखाद्या मोठ्या धक्क्याची गरज आहे - दे ना रे डिव्होर्स मला किंवा एखादं अफेअर कर...

तो : चहा घेतेस ? नाही मस्त लिंबू सरबत करतो तुझ्यासाठी - फ्रेश वाटेल. मग बोलू अफेअरबद्दल...

( ती हसते - हळूच त्याला मिठी मारते)

ती : चल परत पळून जाऊ या... (दोघं मिठीत)

तो : उद्या बघू...

प्रेमात पडावंसं प्रत्येकाला वाटतं

प्रेमात पडावंसं प्रत्येकाला वाटतं, वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने लोक प्रेमात पडतात. कधी अनेक वर्षं ओळख असते आणि अचानक जाणवतं, अरे यार, आपण प्रेम करतोय याच्यावर! तर कधी कधी अगदी पहिल्या भेटीतच तारा जुळतात...

मला असं वाटतं, की प्रत्येक पिढीची प्रेम व्यक्त करण्याची एक स्टाइल असते. ती जुन्या पिढीसारखी असू नये याबाबत आपण एकदम अलर्ट असतो. तरुणाईतली ती कदाचित पहिली बंडखोरी असते. भर उन्हात रस्त्यातून हात पकडून चालणं असो, की सीसीडीमध्ये टाइमपास करत बसणं असो, त्याला किंवा तिला अनेक एसएमएस लिहून खोडणं असो, की त्याच्या किंवा तिच्या नावाचे इनिशियल्स वहीत गिरवणं असो, शॉपिंग मॉलमध्ये काहीही न घेता फिरत राहणं असो की, लेक्चर चालू असताना एकमेकांना मिसकॉल देणं असो... आपल्याला आपल्या पद्धतीने सेलिब्रेट करायचं असतं आपलं प्रेम...

कॉलेजच्या कट्ट्यावरचे दिवस संपले की प्रेम संपून जात नसतं. ते आपल्याला विविध वळणांवर थोडं अधिक मॅच्युअर होऊन भेटत असतं. कधी कॉलसेण्टरच्या खिडकीतून कोणी पाच मिनिटं काढून आभाळाकडे बघत बसतं आणि जाणवतं याच्याशी होऊ शकेल आपली मैत्री, कधी रस्त्यावर आपली जुनी गर्लफ्रेण्ड भेटते आणि तिच्याशी गप्पा मारल्यावर अजूनही आपण एकमेकांचे चांगले मित्र आहोत याचं समाधान मिळतं. कधी रेस्तराँमध्ये बसल्यावर समोरच्या टेबलवर बसलेलं स्वत:मध्येच रममाण असणारं कपल दिसतं, तर कधी थकून घरी आल्यावर नवऱ्याने स्वयंपाक करून ठेवलेला असतो. आपल्या रोजच्या रुटीनमध्ये असे प्रेमाचे क्षण अनेकदा येत असतात, फक्त आपण कधी कधी त्या क्षणांना महत्त्वच देत नाही. ते येतात अन् जातात. त्यांचे आपल्याला भूलवणं चालूच असतं. आपण कामाच्या आणि गदीर्च्या व्यापात विसरून जातो. लोकलमध्ये चढल्यावर ती गाडी दिसेनाशी होईपर्यंत कुणी आपल्यासाठी हात हलवत होतं, हे कळतच नाही. ऑफिसच्या डेली मेल्जमध्ये रोज हायकूची मेल येते, ती कोण करतं आपण बघायचेही कष्ट घेत नाही. गर्लफ्रेण्डसाठी नवीन टी-शर्ट घेताना आपल्याला लक्षातही नसतं तिला कोणता रंग आवडतो... त्याच्या रुटीनची आपल्याला इतकी माहिती होऊन जाते की, कधी सरप्राइज द्यायला तो लवकर आला तर आपल्याला वाटतं मीटिंग कॅन्सल झाली असेल.

मग हे क्षण घरंगळतात, आपल्यावर रुसतात, त्यांना ठोकताळ्यात बसवलं म्हणून अबोला धरतात आणि हळूहळू हरवून जातात. प्रेमाला नाही आवडत बांधलेपणा किंवा चौकट. त्याला त्याच्या पद्धतीने फुलायचं असतं, उमलायचं असतं. एक गुलाबाचं लाल फुल देऊन प्रपोज करण्यापेक्षा साधं सरळ अडखळत विचारणं त्याला आवडतं, दर फ्रायडेला गर्लफ्रेण्डला घेऊन पबमध्ये जाण्यापेक्षा अचानक कधीतरी लाँग ड्राइव्हवर जाणं आवडतं, पिक्चरपेक्षा शांत बसून गप्पा मारलेल्या आवडतात. शॉपिंगपेक्षा शेअरिंग आवडतं, हक्कापेक्षा मोकळीक आवडते आणि मला वाटतं, की हे प्रेमाचे क्षण आपण नेहमी हरवून बसतो ना म्हणूनच Valentine day चा जन्म झाला असेल... आपल्याला ही जाणीव करून द्यायला की, पुढचं वर्ष तरी आपण प्रेमाचे हे अनमोल क्षण मिस करू नयेत...

Tuesday, June 09, 2009

नाही वाचता गं आला

नाही वाचता गं आला
तुझ्या मनातलं तुझ्या
नाही ओठावर येतं
तुझ्या मनातलं सारं
तुझे डोळे सांगतात।

तुझे डोळे सांगतात
तुला म्हणायचं काय
अनवाणी फिरतात
तुझे तुझ्या दारी पाय

तुझे तुझ्या दारी पाय
कसे वाटतात फुलं
तुला पाहूनिया सखे।
मला पडते गं भूलं

मला पडते गं भूल
आता सांगू तरी कुणा
कशा टाळू सांग सखे
तुझ्या नजरेच्या खुणा

तुझ्या नजरेच्या खुणा
माझ्या काळजाच्या आत
त्याच काळजाचा केला
तूच अचानक घात

तूच अचानक घात
केला असा कसा व्यर्थ
नाही वाचता गं आला
तुझ्या डोळ्यातून अर्थ


गणेश एस.भाकरे
नागपूर

माझ्या कवितेच्या वहीत

माझ्या कवितेच्या वहीत
रंगा गंधांची उधळण
काळोखाच्या पानोपानी
शुभ्र चांदण्याची पखरण...

माझ्या कवितेच्या वहीत
अर्थ शब्दांचे उलगडे
कधी हरवलेला चेहरा
माझा मलाच सापडे...

माझ्या कवितेच्या वहीत
माझे जगण्याचे बळ
वाळवंटी वाटेवर जणू
गर्द सावलीचे स्थळ

माझ्या कवितेच्या वहीत
अजून असे बरेच काही
जे शब्दापल्याडचे
शब्दात मावत नाही...

संदीप वाकोडे
सिरसो विभाग
मूर्तिजापूर, जि. अकोला

About Me

My photo
अमरावती - पुणे, महाराष्ट्र, India
इथे तुम्हाला मराठी माणसाच्या जीवणातील विनोद, प्रेम, स्वभाव, राग, आनंद, द्वेष आणि अशी अनेक रुपे कवितेच्या माध्यमातून वाचायला मिळतील. या इंटरनेट आणि इंग्रजीच्या युगात आपली माय-मराठी व तिचे साहित्य कुठे मागे पडायला नको, त्याच्या साठीच हा एक प्रयत्न...
ह्या विभागात वापरण्यात आलेल्या साहित्याचे सर्व हक्क त्या-त्या प्रकाशकाचे किंवा साहित्यकाराचेच. आणि हो कविता आवडल्यास तुमच्या प्रतिक्रीया लिहायला विसरु नका.

Chat with me

Local Time

Live Traffic Feed